राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त खास पत्र लिहिलं आहे.अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून गेले. आजही त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते या धक्क्यातून सावरलेले नाहीत.याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणीत एक अत्यंत भावूक पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी आपल्या मनातील सर्व भावनांना वाट करून दिली आहे. अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि विठ्ठलाबद्दलचा असलेला त्यांचा राग या पत्रातून स्पष्टपणे दिसून येत आहे.अमोल मिटकरी यांनी या पत्रात आपल्या संघर्षाच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. ते म्हणतात की, अनेक लोकांसाठी अमोल मिटकरी हा कदाचित अप्रिय व्यक्ती असेल, मात्र एका छोट्या समूहातून आलेल्या या माणसाला फक्त अजित दादांनीच आपलंसं केलं. आयुष्यात वडिलांनंतर जर कोणी खऱ्या अर्थाने प्रेम दिले असेल, तर ते फक्त दादांनीच दिले.एक काळ असा होता जेव्हा समाज, नातेवाईक आणि अगदी स्वतःच्या परिवारानेही त्यांना दूर लोटले होते. परिवारात फक्त 4 ते 5 लहान सदस्यच त्यांच्याशी प्रेमाने बोलायचे. अशा कठीण काळात, जेव्हा जग त्यांना विनाकारण वाईट ठरवत होते, तेव्हा फक्त अजित दादांनीच त्यांना समजून घेतले आणि ताकद दिली.
राजकीय प्रवासात अनेकदा चुका झाल्या, मात्र अजित पवार कधीही पाठीशी उभे राहण्यात मागे हटले नाहीत, असे मिटकरी यांनी पत्रात सांगिते आहे. प्रत्येक वेळी जेव्हा ते चुकले, तेव्हा अजित दादांनी मोठ्या भावाच्या मायेने त्यांच्या चुका दुरुस्त केल्या आणि त्यांना खंबीरपणे पुढे जाण्यास प्रवृत्त केले. वाढदिवस असो किंवा आयुष्यातील सुख-दुःखाचा कोणताही प्रसंग, दादांचा पहिला फोन हा नेहमी अमोल मिटकरींना आधार देण्यासाठी असायचा. दादांच्या या खंबीर पाठिंब्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो, अशी कृतज्ञता त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.पत्राचा शेवट करताना अमोल मिटकरी यांनी देवावरचा आपला राग व्यक्त केला आहे. योगायोगाने आज एकादशी आहे आणि याच दिवशी विठ्ठलाने त्यांच्या लाडक्या दादांना हिरावून घेतले.मिटकरी लिहितात की, दादा तुमच्यामुळेच मी विठ्ठलाच्या प्रेमात पडलो होतो, मात्र त्याने याच दिवशी तुम्हाला आमच्यापासून दूर नेले. तो विठ्ठल आता माझ्या नजरेतून सुटला आहे आणि त्याच्याशी माझे आयुष्यभर भांडण कायम राहील. लव्ह यू दादा, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना पूर्णविराम दिला आहे.😢😢😢

0 टिप्पणियाँ